Hottal Mahotsav 2022
होट्टल महोत्सव विषयी :
नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले व चालुक्यांची उपराजधानी म्हणून पुरातन काळात नावारूपाला आलेले ग्राम म्हणून होट्टलची ख्याती आहे. होट्टल येथे सिध्देश्वराचे प्राचीन चालुक्य मंदीर स्थित असून सभोवती अनेक प्राचिन मंदिरे आहेत. प्राचिन शिल्प स्थापत्य कलेचा समृध्द वारसा जतन, संवर्धन करणे पर्यटन वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जनजागृती करणे पर्यटकांना तसेच महाराष्ट्रातील लोकांना या ऐतिहासिक व प्रेक्षणिय स्थळांची माहिती देणे या दृष्टीने सांस्कृतिक तथा पर्यटन महोत्सव आयोजित होत आहे.
होट्टल महोत्सव 2022:
आढावा बैठकीचे इतिवृतांत २२/०३/२०२२(पी.डी.एफ.)
आढावा बैठकीचे इतिवृतांत २८/०३/२०२२(पी.डी.एफ.)
निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम रूपरेखा:
![]() निमंत्रन पत्रिका |
होट्टल महोत्सव पूर्वतयारी:
होट्टल महोत्सव उद्घाटन दि.०९-०४-२०२२ :
होट्टल महोत्सव दि. १०-०४-२०२२ :
नांदेडच्या सारस्वतांचा होट्टल महोत्सवात नृत्यांजलीसह स्वराभिषेक,ज्या स्थानिक कातळावर अप्रतिम शिल्पकलांना साकारून होट्टल येथील विविध मंदिरांच्या शिल्पकला साकारल्या त्या मंदिरातील ऐतिहासिक वैभवाला नांदेड जिल्ह्यातील सारस्वतांनी आपल्यातील अंगभूत कलेचा प्रत्यय देत होट्टल महोत्सवाचा दुसरा दिवस भारून टाकला. कर्नाटकच्या सिमेवर असलेले होट्टलचे पठार चैत्रातल्या उष्णतेला सावध घेत दिवस मावळता गणिक शीतलतेची छाया देऊन गेला. मंदिराच्या काठावर उभे राहिलेल्या रंगमंचाची दिवे जसजसे उजळत गेले तसे गणेश वंदनेने भक्तीरसाची जोड दिली.
बिलोलीचे भूमिपुत्र असलेले दिलीप खंडेराय यांचा महाविद्यालयीन जीवनापासून लोककला, लोकपरंपरा यातील फार जवळून अभ्यास राहिलेला आहे. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत त्यांनी गण, गवळण, गोंधळ हे महाराष्ट्रातील लोककला प्रकार प्रवाहित केले आहेत. होट्टल महोत्सवात दिलीप खंडेराय व संचाने आज बिलोली भागातील लुप्त पावत चाललेला लोककला प्रकार हलगी व सनई नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मीना सोलापूरे यांनी शिवस्तुती गीत सादर केले.
आपल्या पत्रकारितेसह संगिताची आवड जपत नांदेड येथील पत्रकार विजय जोशी यांनी आपल्या कलोपासनेला अंतर पडू दिले नाही. यातील साधना सुरू ठेवत त्यांनी देशप्रेमासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले. “सैनिक हो तुमच्यासाठी” याचे राज्यभर 50 प्रयोग त्यांनी पूर्ण केले आहेत. नव्या पिढीपर्यंत महाराष्ट्राची लोकधारा पोहचावी यासाठी लोककलेला केंद्रभूत ठेवत त्यांनी लुप्त पावत चाललेल्या अनेक लोककलांना, कलावंतांना संधी देऊन कार्यक्रमांची निर्मिती केली. दिवाळी पहाट, पाडवा पहाट अशा अनेक उपक्रमातून त्यांनी आपले गायनही सादर केले आहे. होट्टल महोत्सवात त्यांनी मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाद्वारे मराठी लोकरंगचा सुरेख प्रत्यय दिला.
कुमारी गुंजन पंकज शिरभाते हिचे व्हायोलिन वादन, किनवटच्या बोधडी येथील अंध विद्यालयातील राजेश ठाकरे यांनी महोत्सवातील कार्यक्रमाची रंगत वाढवत नेली. आपल्या वडिलांकडूनच व्हायोलिनचे धडे घेत कुमारी गुंजनने वेगळी अनुभूती होट्टल वासियांच्या प्रत्ययाला दिली. राजेश ठाकरे यांनी या महोत्सवाला आपल्या सुराभिषेकातून न्हावून काढले. मुळात मंदिराचा परिसर असलेल्या या काठाला त्यांच्या गायनाने भक्ती व भावरसाची अप्रतिम जोड देत महोत्सवाचा दुसरा दिवस सार्थकी लावला.
अर्धनारी नटेश्वराचे रुप म्हणून ज्या शिवाकडे पाहिले जाते त्याची आराधणा शिवपुष्पांजली, शिवस्तुती आणि शिवपदमद्वारे डॉ. भरत जेठवाणींचे शिष्य श्रृती पोरवाल, इशा जैन, अथर्व चौधरी, गौरी देशपांडे यांनी अप्रतिम सादरीकरण केले.
प्रारंभी सर्व कलावंतांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी डॉ खुशालसिंह परदेशी यांनी स्वागत केले. आमदार जितेश अंतापूरकर यांनी सर्व कलावंताचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन कवी बापू दासरी व आश्विनी चौधरी यांनी केले.
होट्टल महोत्सव दि. ११-०४-२०२२ :
ग्राम विकासाची संकल्पना बाहेरचा कोणी व्यक्ती येऊन आपल्या गावात राबवेल ही धारणा चुकीची आहे. आपल्या गावात जे काही चांगले होते, जे काही वाईट होते ते गावातले लोकच करत असतात, ग्रामस्थच ठरवत असतात. चांगल्या गोष्टीची मेळ साधण्यासाठी व वाईट प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातील सरपंच हा कडक गुरुजीच्याच भूमिकेत असला पाहिजे, असे अग्रही प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
आज होट्टल महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासमवेत ग्राम विकासाच्या दृष्टिने लोकप्रबोधन व्हावे यासाठी आवर्जून माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
या समारोपात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने, देगलूरचे गटविकास अधिकारी मुक्कावार, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर यांची विशेष उपस्थिती होती.
जीवन जगण्यासाठी केवळ आहाराची आवश्यकता नसते तर त्याच्याबरोबर शुद्ध हवा ऑक्सिजनची तेवढीच गरज असते. याकडे आपण लक्ष दिले नाही. चांगले ऑक्सिजन झाडे देतात. यासाठी गावकऱ्यांनी झाडांची जोपासना केली पाहिजे. ही झाडे प्रत्येक ग्रामस्थांनी पुढे येऊन लावली पाहिजेत. ती जपली पाहिजेत. आमच्या गावात प्रत्येक प्रकारची फळ झाडे लावण्यावर आम्ही भर दिला. स्मशानभूमीत जांभळाची झाडे लावली, नारळाची झाडे लावली, सिताफळाची लावली. यात 60 क्विंटल जांभळे मिळाली, 20 लाखाची नारळ झाली. गावकऱ्यांना सीताफळ सारखा रानमेवा मिळाला. आरोग्यासाठी या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा झाला, असे सांगून त्यांनी फळझाडे लावण्यावर भर दयावा, असे आवाहन केले.
प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या ग्राम विकासाच्या आराखड्यात सहभाग घेतला पाहिजे. साध्या कचऱ्यापासून प्रत्येक गोष्टीची वर्गवारी ग्रामपंचायतला करता आली पाहिजे. ग्रामसेवकाकडे विकासाचा दूत म्हणून सर्वांनी पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावातील वृद्ध, निराधार लोकांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनी पाटोदा गावातील वृध्द आणि निराधाराचे केले जाणारे संगोपन याची माहिती दिली. गावासाठी जे काही चांगले करता येईल ती करण्याची शुद्ध भावना ही ग्रामपंचायतीची असली पाहिजे. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा बदला पाहिजे. महिलांच्या सुविधांसाठी खूप काही गोष्टी ग्रामपंचायतला करता येण्यासारख्या असतात. पिठाच्या गिरणी पासून मसाले काढणे, शेवाळ्याची मशिन, तेलाची मशीन हेही ग्रामपंचायतीने उभे केले पाहिजेत. आम्ही आमच्या गावात या सर्व गोष्टी करून त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिनही पुरवत असल्याचे त्यांनी स्पष्ट करून महिलांप्रती सन्मानाची दूरदृष्टी ठेवण्याचे आवाहन केले.
अर्चना सावंत व लहान मुलींनी सादर केलेल्या लावणी नृत्यांने रसिकांची मने जिंकली
प्रसिद्ध लावणी नर्तिका “अप्सरा आली” फेम अर्चना सावंत यांनी बहारदार लावण्याद्वारे होट्टल येथे जमलेल्या हजारो ग्रामीण रसिकांची मने जिंकून महोत्सवाची सांगता केली.
तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात प्रथितयश गायक मंगेश बोरगावकर यांच्या सदाबाहर गाण्यांची मैफल तर खंडेराय प्रतिष्ठाणने गण-गवळण-गोंधळ हा लोककला प्रकार सादर केला. ललीत कला केंद्र पुणेच्या कुमारी श्रृती संतोष पोरवाल यांनी कथ्थक नृत्य सादर केले. ऐनोद्दीन फखरोद्दीन वारसी व त्यांच्या संचाचे बासरी वादन केले. राजेश ठाकरे यांचे शास्त्रीय गायन, डॉ. भरत जैठवाणी यांच्या शिस्यांनी शास्त्रीय नृत्य तर विजय जोशी यांनी मराठी पाऊल पडते पुढे, मराठी लोकरंग हे कार्यक्रम सादर झाले.
समारोपाच्या लावणी नृत्यात कु. सोनल भेदेकर, कु. विद्याश्री येमचे, कु. आराध्या सेरीकर या तीन मुलींना दिलखेचक आदांनी महोत्सवात रंगत भरली व नांदेड जिल्ह्यातील कलागुणवत्तेचा प्रत्यय दिला.