कंधारचा भुयकोट किल्ला
कंधारचा भुयकोट किल्ला नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात, नांदेड मुख्यालयापासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर आहे. शिलालेखांनुसार, राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी इ.स. 758 मध्ये किल्ल्याची उभारणी केली. प्रारंभी हा किल्ला मातीचा होता, नंतर राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा यांनी इ.स. 941 मध्ये दगडी बांधकाम करून तो पूर्ण केला.
हा किल्ला सुमारे 24 एकर क्षेत्रफळात पसरलेला असून, त्याभोवती 100 फूट रुंद व 25 फूट खोल खंदक आहे. किल्ल्यास दोन तटबंदी, एकूण 32 बुरुज आणि 4 प्रवेशद्वारे आहेत.
किल्ल्यात राणीचा महाल, दरबार हॉल, बारादरी, जलमहाल, बारूदखाना, जनानखाना, स्नानगृह, लाल महाल, मशीद, उद्यान, धान्य कोठारे इत्यादी अवशेष पाहायला मिळतात.
येथे अनेक तोफा असून, त्यातील अंबरी बुरजावरील अंबरी तोफ ही अष्टधातूपासून बनवलेली सर्वात मोठी तोफ आहे. फारसी, अरबी, संस्कृत व प्राकृत भाषेतील अनेक शिलालेख येथे आढळतात. कंधारचा भुयकोट किल्ला हे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक व पर्यटनस्थळ आहे.